Tuesday, 24 October 2017

तर सायकलला राम-राम ! Horse Riding





घोडा हा प्राणी असा आहे तुम्ही त्याच्या सहवासात आलात की कधी प्रेमात पडता हे कळतच नाही. कोळथरेला रहात असताना माझ्या घोडसावारीच्या प्रेमाने पुन्हा एकदा उचल खाल्ली. दापोलीत १-२ 'घोडाप्रेमी' आहेत हे मला माहिती होते. मी लगेच विनय दादाला (माझा सर्वात मोठा भाऊ) फोन लावला. तालुक्यातील अस्सल मंडळी त्याच्या संपर्कात असतात. त्याने मला लगेचच दापोली-जालगाव मधील  घोडामालक श्री. कोळथरकर यांचा नंबर दिला. ते एक 'खानदानी' घोडा शौकीन आहेत.

माझे वडील(मामा महाजन) रोज नित्यनेमाने दिड-दोन तास आमच्या जागाजमिनीत फिरत असत. डोंगरदऱ्यांत, रानात फिरताना त्यांच्या सोबत कायम एक बगलथैली, कोयती आणि एक आकडी-डेलकी (काठीला एका टोकाला आकडा आणि दुसऱ्या टोकाला इंग्रजी 'V' सारखा आकार) असे. त्यांचे एक नेहमीचे वाक्य असे "जो कुंपण राखतो तोच जमीनजुमला राखतो" म्हणून रोज या साजोसामानासह भ्रमंती. हा दिनक्रम माझ्या स्मरणाप्रमाणे वयाच्या सत्तरी पर्यंत सुरु होता. रानावनातील ही रोजची भटकंती पाहून कोणीतरी मामांना घोडा घेण्याचे सुचविले, त्यांना देखील ही कल्पना पटली. एकदा मनात आल्यावर ती गोष्ट करायचीच असा मामांचा खाक्या. परिणामी आमचे कडे आधी 'यशवंत' आणि नंतर 'लक्ष्मी' नावाची घोडी होती. यशवंत/यश्या हा स्थानिक ओळखीने मिळाला होता. लक्ष्मीला आणण्यासाठी बाबा (मोठा भाऊ उदय) आणि त्याचा मित्र सुहास असे अलिबाग जवळ गेले होते. त्यांना यायला ४-५ दिवस लागले होते असे आठवते. उन्हात चालून त्यांच्या त्वचेचा रंग बदलला होता. यश्या थोडा थकलेला होता लक्ष्मी मात्र तरुण आणि धष्टपुष्ट होती. 'भाकरी का करपली घोडा का अडला?' या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतला आहे. दोन-तिन दिवस घोड्याला रपेट केली नाही की लगेच तो फेरफटका मारण्यास विरोध करतो. इतकेच काय आपण दोन दिवस त्याला एकाच वाटेने नेले तर तिसऱ्या दिवशी नवीन वाटेने त्याला घेऊन जाणे म्हणजे कर्मकठीण. 

माझ्या मोठ्या बहिणीची (गांधाताई) मुले लहान असताना मे महिन्यात महिनाभर आजोळी कोळथरेला रहायला येत असत. माझ्या स्मरणाप्रमाणे मामांनी लग्नात तशी अटच घातली होती. मामा रोज शुभुला (भाची) घोडीवर बसवुन गावात फेरफटका मारायला पाठवत त्यावेळी सोबत एक सांभाळणाराही असे. गावातून फिरत असताना मामांचे चाहते कोणी घरातून कोणी दारी येऊन कौतुकाने पहात असत. सर्व कार्यक्रम म्हणजे एक सोहोळाच होऊन जाई.


मामांनी सांभाळलेले दोन्ही घोडे स्थानिक होते. मी दापोलीला कोळथरकरांकडे घोडसावारी शिकायला जायचो तो 'शेरू' रेसच्या घोड्यासारखा उमदा, उंच, तगडा आणि पांढराशुभ्र होता. मी सकाळी ६ वाजता घरून निघून दापोलीत तासभर सराव करून ९ च्या आत घरी हजर होत असे. १५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मी कोळथरकरांना वाकून नमस्कार केल्यावर  त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.  शेरू आणि माझी चांगली गट्टी जमली होती मालकही मला म्हणत डॉ शेरुचे तुमच्यावर खास प्रेम आहे. पहिले ५-६ दिवस शिकण्यात गेले नंतर मात्र शेरू घामाने भिजे पर्यंत आमची रपेट चालत असे. घोड्यावर स्वार झाल्यावर आपल्या अंगात एक वेगळीच उर्मी निर्माण होते, जणूकाही 'अश्वशक्ती' आपल्या शरीरात संक्रमित झाली आहे. एक प्रकारची झिंग, मग त्याची चटक लागते. 

एप्रिल-मे मधे कधीतरी शेरूच्या पायाला मोठी जखम झाली. उपचारांत मदतीसाठी मी आठवड्यातून एखादा दापोलीत जात असे. पुढे कोळथरकर म्हणाले तुम्ही शेरूला पावसाळ्यात तुमच्याकडे घेऊन जा इथे थोडी अडचण होईल. माझ्यासाठी ती संधीच होती. मी अण्णा (मोठे बंधू- माधव) जवळ बोलून आमच्या गोशाळे (गोठा) शेजारी शेरुसाठी जागा तयार करून घेतली. एक दिवस संध्याकाळी ट्रक मधून शेरुची स्वारी आमच्या अंगणात दाखल झाली. शेरूचा आकार, चाल, उमदेपणा, पांढरा रंग हे पाहून आई आणि पत्नीचे डोळे चमकले, दोघीही खुश झाल्या. शेरू २-३ महिने आमचे कडे होता. जखमेची सुश्रुषा, खरारा, रपेट ई मी रोजच करत असे शिवाय  शेरू रात्री अपरात्री चक्कर आल्यासारखे होऊन कोसळत असे त्यामुळे रात्रभर मला सतर्क राहावे लागे. त्याला उठवून उभे करणे खूप जिकरीचे होई त्यामुळे माझ्या काळजीने बायकोही मदतीस येत असे. या सर्व उपद्व्यापाचा परिणाम माझ्या तब्बेतीवर होऊन माझे वजन ४-५ किलोने कमी झाले. शेवटी आई आणि सौ गौरीने 'फतवा' काढून शेरुची रवानगी करण्याचे आदेश दिले. कोळथरकर शेरूला नेण्यास आले, शेरुची तब्बेत पाहून एकदम खुश झाले. मी माझी अडचण सांगून दिलगिरी व्यक्त केली तेव्हा म्हणाले " डॉक्टर घोडा ८ दिवस नीट सांभाळणे कठीण आहे तुमचे कौतुक करायला हवे."  शेरू आमच्या आवारातून बाहेर पडण्यास नाखुश होता कोळथरकरांनाही ते जाणवले.

काही दिवसांनी मी शेरूला भेटण्यास गेलो होतो, शेरू चरायला गेला होता आणि ५-७ फुट उंच वाढलेल्या गवतात तो दिसतही नव्हता. कोळथरकरांनी दोन-तिन हाका मारूनही शेरू आला नाही. ते म्हणाले डॉक्टर तुम्ही हाक मारा तो नक्की येईल आणि तसेच झाले,  घंटेचा घण-घण आवाज करत शेरू समोर हजर झाला. मी आनंदून गेलो.
मी घोड्यावर मनापासून प्रेम करतो. जैसलमेरला सायकलिंगसाठी गेलो असताना शेतात घोडा दिसल्यावर त्यावर स्वार होण्याचा मोह मी टाळू शकलो नव्हतो.


पुण्यात घोडा पाळणे शक्य झाल्यास मी सायकलला राम-राम करेन. 
                      


Friday, 29 September 2017

डोळे लागले ! Forest Night Life


पुण्यात रहाणेस आल्याने दापोली मधील मित्रांची भेट क्वचितच होते. दापोलीला गेलो असताना मित्राने; मी दापोली पर्यंत २० किमी सायकल चालवत जावून त्याला दिलेल्या  'मेजवानी' ची आठवण काढली. थोड्या गप्पा रंगल्या आणि मला जुन्या घटना आठवल्या. 

पूर्वी शहरांत अमुक एका क्लब अथवा जिमखान्याचे मेंबर्स बाबत जसे कौतुक, कुतूहल, औत्सुक्य असे तसे काहीसे शिकारीला जाणाऱ्या मंडळी बाबत गाव-खेड्यात असते.  यांची टोपणनावेही खास असतात आमच्याकडे एक जोडी होती, टारझन आणि डाबरमन. मी शाकाहारी असल्याने खरतर या जमातीत आगन्तुकच. मिळालेल्या ‘मेजवानीचा’ आस्वाद घेण्याची माझी ऐपत नाही.



जंगलातून रात्री फिरण्याची एक वेगळीच मजा असते. चारी दिशांना पसरलेला मिट्ट अंधार असल्याने अंदाज बांधण्यासाठी पायवाटेवरील खाणाखुणा दिसत नाहीत. दिवसा ज्या पायवाटांवरून आपण फिरलेलो असतो तेच जंगल रात्री भयंकर गूढ, अनाकलनीय आणि भीतीदायक वाटते. पंचक्रोशीमधे  जखमी डुकराने हल्ला करून गंभीर इजा झालेली एखादीतरी व्यक्ती असते, त्यामुळे अशा अदृश्य शक्तीची भीती मनात असतेच, किर्र अंधारात ती आणखी गहन होते. शिकारी साठी फिरताना मोठ्या प्रकाशाची विजेरीही वापरू शकत नाही. मोठ्या प्रकाशझोताची एक बॅटरी सोबत असते पण ती फक्त सावजाचा शोध घेण्यासाठी. पुढे चालणाऱ्याच्या हातातील बॅटरीचा उजेड त्याच्या पायाखाली पडत असतो उरलेले भिडू त्याच्या मागोमाग अंदाजाने मुंग्यांसारखी रांग करून चालतात. खांद्यावरील अवजड बंदुकीचे ओझे आणि आपला तोल सांभाळत चालणे म्हणजे परीक्षाच. वाटेत काटे-कुटे, खाच-खळगे, दगड-धोंडे, विविध वेली यांना चुकवत, पायांचा कमीतकमी आवाज करत समोरच्या व्यक्तीच्या चालीने मार्गक्रमण करणे म्हणजे तारेवरची कसरतच. बर पायात हंटर किंवा ट्रेकिंग शूज नाहीतच, बहुदा स्लीपर- सॅंडल म्हणजे चैन  आणि फुल पँन्ट कापून केलेली अर्धी चड्डी हा गणवेश. बंदुकधारी (बरकनदाराचा) वेश पण खास. मुंबईकर, मित्र किंवा पाहुणा याने दिलेला कोट अथवा जाकेट, त्याला २-४ खिसे वेगवेगळ्या ताकतीची काडतुसे ठेवण्यास गरजेचे. दोन प्रकारची नियमित मिळणारी काडतुसे आणि एक हायब्रिड म्हणजे भरलेले काडतूस . भरलेले म्हणजे ३ काडतुसांतील मालमसाला काढून दोनात भरायचा आणि शे दीडशे छोट्या गोळ्या काढून १५-२० मोठ्या गोळ्या भरायच्या. प्रत्येक काडतूस कधी आणि कोणासाठी वापरायचे यांचे ठोकताळे ठरलेले असतात. रात्री चालताना कान उघडे ठेवून सतर्क राहून बारीकसारीक आवाज टिपावे लागतात. सळसळ, फरफर, फ्रूक, ख्याक अशा विविध आणि विचित्र आवाजांचे सतत विश्लेषण करावे लागते. यात रात्री नेहमी चकवा देणारा प्राणी म्हणजे उंदीर. उंदीर सुक्या पानावरून धावत गेल्यास त्या भयाण शांततेत मोठे सावज गेल्याचा भास होतो.


सामान्यपणे रानडुक्कर, जंगली ससा, साळींदर, भेकर (हरीण वर्गातील प्राणी) हे हिटलिस्ट वर असतात. ससा, भेकर, साळींदर यांच्या ठावठिकाण्याचा अंदाज बांधता येतो. रानडुक्कर म्हणजे धूमकेतूच, कधी कोठून उगवेल याचा नेम नाही. चालता चालता कोणाचातरी कान एखादा आवाज टिपतो. लगेच श्शू s s s .....अशा सांकेतिक भाषेत संदेश पसरतो. सर्वजण स्तब्ध उभे राहून कानात जीव ओतून आपापल्या परीने आवाजाचा वेध घेतात. काळोखातच हातवारे, खाणाखुणा करून सावजाचा अंदाज घेऊन बॅटरी टाकण्याची सूचना मिळते. बॅटरी टाकणे म्हणजे सावजाच्या दिशेने प्रकाशझोत टाकणे. बॅटरी धरणारा लगेच इप्सित दिशेने प्रकाशझोत टाकतो, बहुतेक वेळा तिथे कोणी नसतेच. मग आजूबाजूला, झाडाझुडपात, बांधावर शोध सुरु होतो, अचानक कोणाचातरी डोळा लागतो ; डोळा लागतो म्हणजे प्रकाशझोतात सावजाचा डोळा चमकतो. क्षणभर पुन्हा सगळे शांत, वातावरण एकदम तंग.. ९० टक्के वेळा तो कापूरकवडा असतो आणि क्षणात तो भुर्रकन उडूनही  जातो. १५-२० मिनिटांच्या या तंग, तणावपूर्ण खेळाचा अंत अशा फुसक्या बाराने होतो. या डोळे लागण्यावरूनच सावजाचा अंदाज बांधून पुढील सर्व निर्णय घ्यावे लागतात. त्याच मुळे विजेरीवाला हा चलाख, सतर्क आणि अनुभवी असावा लागतो.

तासावर तास, दिवसामागून दिवस हा लपाछपीचा खेळ सुरु असतो. शिकार फार क्वचितच मिळते पण त्या थराराची नशा चढते आणि दारुडे जसे रोज आपल्या पंढरीची वारी करतात तसेच काहीसे शिकारीला जाणाऱ्यांचे होते. जणू व्यसनच, एकदा लागलं की सुटका नाही.   
Ramdas Mahajan !

Sunday, 17 September 2017

गरुडझेप White Bellied Sea Eagle









गरुडझेप
समुद्रकिनारी खेडेगावात रहात असल्याने समुद्र आणि एकूणच निसर्गाशी जवळचा संबंध येतो. निसर्गप्रेम आणि धडपडा स्वभाव यामुळे चिपळूणचे श्री. भाऊ काटदरे यांचेशी संपर्क आला, ते ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ संस्था चालवितात. समुद्री कासवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे काम संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ते करतात. आम्ही हे काम सुरु केले तेव्हा ते ‘इन’ किंवा ‘कूल’ समजले जात नव्हते. अता प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट केला जातो त्यामुळे तळमळीने काम करू इच्छिणारी मंडळी कामात सहभागी होण्यास बिचकतात.  असो तो आत्ताचा विषय नाही. कासव प्रत्यक्ष अंडी घालताना पहायला मिळणे दुर्मिळच असते. ७/८ वर्ष काम करताना मी दोन वेळाच ते पाहू शकलो. कासव स्वतः वाळूत खड्डा खणून त्यात अंडी घालते आणि समुद्रात निघून जाते. 
कोळथरे येथील कामाची जबाबदारी मी घेतली होती म्हणून रोज पहाटे किनाऱ्यावर फेरफटका मारत असे. थंडीच्या दिवसात सकाळी  ६.०० – ६.३०  पर्यंत समुद्रावर अंधारच असतो. असाच एके दिवशी समुद्रावर गेलो असताना १०/१२ कुत्री रिंगण करून फिरताना पाहिली. लांबून काही समजेना, जवळ गेलो तर एक भला मोठा पक्षी पंख पसरून मधे उभा होता. त्याचा पंख विस्तार जवळपास सहा फूट असावा (आम्ही नंतर तो मोजलाच). कुत्रे बहुदा त्याचा अवतार पाहून बावरले असावेत, मी जवळ गेल्यावर सर्व पळून गेले. पक्षाचा अवतार पाहून त्याला पकडण्याचा माझाही धीर होईना, कसा तरी पकडून घरी आणला. घरी आणल्यावर पाहिले तर कोणतीही विशेष जखम दिसली नाही.  दरम्यान पाहुण्यासाठी तात्पुरता पिंजरा उभा केला आणि आगोमच्या औषधांचे उपचारही सुरु केले. या कामात माझ्या मुली, पुतण्या हिरीरीने सहभागी होतात.
चिपळूणला  भाऊ काटदरेना फोन करून वृतांत सांगितला, ते म्हणाले हा समुद्र गरुड ( White
Bellied Sea Eagle)  आहे आणि झाडाच्या फांदीवर जोरात आपटल्याने त्याला  मानसिक धक्का बसला आहे त्यातून बाहेर येण्यास एक दिवस तरी जाईल.
आम्ही त्याला मासे खाऊ घालण्याचा प्रयत्न करत होतो पण तो काहीही खात नव्हता. त्याचे डौलदार शरीर, पोटाचा नितळ पांढरा रंग आणि राजेशाही रुबाब पाहून आम्ही त्याच्या प्रेमातच पडलो. दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला मुक्त केले पण बागेतील घट्ट पोफळी (सुपारीची झाडे) मधून त्याला भरारी घेता आली नाही आणि शेजारील बागेत खाली कोसळला.  पडल्यावर त्याने पायात धरलेलं पोफळीचे पान   (झावूळ) आम्हाला कोयत्याने कापून काढावे  लागले, त्याची पकड इतकी घट्ट होती. शेवटी त्याला समुद्रावर नेऊन सोडल्यावर त्याने ‘गरुडझेप’ घेतली आणि क्षणात दिसेनाहीसा झाला.
खेड्यात रहाण्याचे अनेक फायदे, त्यातील हा एक. आणखी किस्से परत कधीतरी.
 
   
राम राम !

चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...