Saturday, 22 May 2021

करोना : चौफूशे : Terrace Garden

      करोना,  काही तरी करा ना !



         दिवस मोजून थकलो, कित्येक महिने उलटले, दोन हजार वीस साल उलटून एकविस मधील पाच महिनेही सरले पण काळ, करोनाच्या  'साथीने'  स्तब्ध उभा आहे. अनेकांना आर्थिक, मानसिक दृष्ट्या रक्तबंबाळ करून सोडणारा  असा हा कालखंड !

कॉलेज जीवनापासूनच व्यायामाचे वेड थोडंफार का होईना होतंच, काळासोबत त्याचं महत्व आणि औचित्य प्रकर्षाने जाणवू लागले. शिवाय  अनिल कपूर, मिलींद सोमण इ चिरतरूण व्यक्तींकडे पाहून जोश वाढतोच !  या ठाणबंध कालावधीत अनेकविध प्रकारचे व्यायाम, आहारावरील निर्बंध पाळून शरीर आणि मन आणखी सुदृढ करण्याचा कसोशीने प्रयत्न सूरू ठेवला आहे.  याच काळात आणखी एका 'दिल के करिब' असणाऱ्या विषयाने उचल खाल्ली, तो विषय म्हणजे परसबागेत फळं, फुलं, भाजी लागवड.
                                       

       माणूस आणि झाड !

मुळचा कोकणातील असल्याने शहरामधील चौरस फुटातील शेती / बाग  (चौफूशे ) तशी लवकर पचनी पडणारी नव्हतीच. दोन हजार तेरा साली पुण्यात स्थायिक झाल्यापासून सहा सात वर्ष द्विधा मनःस्थितीमुळे वाया गेली. कोळथरेला रहात असताना गावातील कै. शरद दादा जोशी च्या आग्रहामुळे श्री निळू दामले यांचे 'माणूस आणि झाड'  पुस्तक नुसतं चाळलं होतं. ज्यावेळी चौरस फूटातील शेती / बाग (चौफूशे)  करण्याचे मनात आले तेव्हा तेच पुस्तक व्यवस्थित वाचले आणि मी प्रभावित झालो.  शहरात ज्यांना चौफूशे करायची आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे

         चौफूशे

         गच्चीत  चौफूशे करून फळं, भाज्या, फुलं पिकवायची म्हणजे त्याची पूर्वतयारी अत्यावश्यकच. बागेला शक्यतो आपल्या आवरातील पालापाचोळा, काडी कचरा, घरातील ओला कचरा हेच वापरायचे असे ठरविले होते,  थोडक्यात बिनामाती शेती ! आमच्या बंधूंचे मित्र श्री सुनिल भिडे, आमची एक मैत्रिण कीर्ती यांनी आपल्या गच्चीत फुलविलेले नंदनवन पहायला मिळाल्याने चांगली प्रेरणा मिळाली.

                                               

      फुकट ते पौष्टिक !

पर्सनल गुगल पुन्हा कामी आले,  मित्र शेखर फाटक कडून वाफ्याखाली घालण्यासाठी  उत्तम दर्जाचे प्लास्टिक, मैत्रिण गौरी भावे हिच्या कडून आवश्यक असणारे मजबूत टिकावू ड्रम्स,  सर्व चकट फू उपलब्ध झाले,  फुकट ते पौष्टिकच !  सदाबहार मित्र विवेकच्या संपर्कातून हॉलो ब्लॉक्स आणले, सर्व साधनसामग्री गोळा झाल्यावर कार्यवाही सुरू केली.  श्री दामलेंनी सूचविल्या प्रमाणे ड्रम्समधे उसाचे पाचड, पालापाचोळा आणि हरित द्रव्य  कुजून तयार झालेला मसाला घालून ड्रम्स तयार केले.

                                              

गच्चीत उद्योग करणार हे कळल्यापासून बायकोने फुलझाडं लावण्याचा घोषा सुरु केला होता तिच्या समाधानासाठी झेंडू लावला ! मला खरतंर भाजी पिकविण्यातच स्वारस्य होते. काकडी, दुधी, खरबूज, भोपळा या वेलवर्गीय भाज्या, दोन प्रकारचे अळूं, पालक, टोमॅटो, पुदिना, गवती चहा असे इतर प्रकार लावून श्रीगणेशा केला आहे.

                                                         
भाजी पिकवून थांबता येत नाही त्याचं काहीतरी व्यंजनही बनवावं लागते. गृहलक्ष्मीने दुधीहलवा, पाणीपुरी, अळूवडी आणि इतर काहीबाही बनविलं,  आज आस्मादिकांनी पालकाची कोशिंबीर बनवून स्वतःच ताव मारला. आता ध्यास लागलाय भोपळ्याच्या गरमागरम घारग्यांचा ! 
                                                         
माझ्यावर  देवाची कृपा सतत राहिली आहे त्यामुळे चौफूशे मधेही यश येईल याची खात्री वाटते.

विशेष उल्लेखनीय : प्रत्यक्ष कामाला सुरवात केल्यावर आनंदराव पाळंदे यांनी त्यांच्या गच्चीतील झाडोरा दाखवून उपयुक्त सूचना केल्या. या विषयावर एक ब्लॉग लिहिण्याची सूचना वजा आदेश श्री अतुल सुळे यांनी दिला.

दोघांचे आभार !
                                                 






Saturday, 3 April 2021

पुणे वाई पांचगणी भिलार वाई Solo Cycling



लैस विथ कॅश ते लेस कॅश

पुण्याहून मध्यकोकणात उतरण्यासाठी मुळशी मधून जाणारा रस्ता गेले तीन वर्ष गाडी चालविण्याच्या परिस्थीतीत नाही. गेल्या काही महिन्यांत त्यात खूपच सुधारणा झाली आहे हे खरं आहे.  मुद्दा हा की आम्हाला नेहमीच वाई महाबळेश्वर या काहीशा लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागे. मुळात महाबळेश्वर किंबहूना थंड हवेच्या ठिकाणांवर असणारे माझे प्रेम, या सततच्या प्रवासामुळे आणखी दृढ होत गेलं. त्यातही पसरणी घाट, आणि पांचगणी ते महाबळेश्वर हा परिसर कायमच मोहीत करतो. या भागातून जाताना शरीर गाडीत असलं तरी मन मात्र कायम सायकलच्या सीटवर बसूनच प्रवास करत असे.

एकला चलो रे

पुण्यात माझे समविचारी मित्रमंडळ असल्याने सायकल प्रवासात नेहमी सोबतीला कोणीतरी असावे असे वाटत असते, गंतव्य ठिकाणापेक्षा प्रवासातील आनंद अधिक महत्वाचा. याही वेळी अनेक जणांशी प्रवासाबाबत विचारविनिमय केला पण शेवटी एकट्यानेच बाहेर पडावे लागले. 

दोन तीन दिवसांचाच प्रवास आणि तोही सुपरिचीत भागात त्यामुळे फार मोठी तयारी करणेची  गरज भासली नाही. असे असले तरी सफर विनाविघ्न पार पाडण्यासाठी किमान आवश्यक तयारी केली. उन्हाळ्याचा फोफाटा लक्षात घेवून सोबत भरपूर पाणी घेतलं शिवाय पाण्यात बरेच खजूर आणि मीठही घातले प्रवासात त्याचा फायदा झालाच.

कॉमन सेन्स इज नॉट कॉमन

शनिवार वीस मार्चला सकाळी सहा वाजता घर सोडलं, हवा अल्हाददायक होती. नवीन कात्रज बोगद्याचा घाट रस्ता नेहमीचा चाकाखालचा असल्याने विनातक्रार बोगदा पार केला. चहाचा मोह टाळून सायकलिंग सुरू ठेवलं. वसुंधरा गुळ प्रक्रिया उद्योगाचा फलक पाहिल्यावर सायकलची चाकं तिकडे वळलीच. गरमागरम ताजा गुळ दिसल्यावर त्याचा आस्वाद न घेणं म्हणजे गुळाचा घोर अपमानच ! घरच्यासाठी एक लिटर काकवी घेवून मार्गस्थ झालो.  पारंपारिक कलाकौशल्य आधुनिकीकरणाच्या रेट्यात चिरडली जाताना पाहून आत्यंतिक दुःख होते पण हायवे शेजारी शेतकरी बाई शेण गोवऱ्या थापतांना पाहून मन प्रसन्न झाले.शिरवळ गावा आधी राजस्थानी पुरोहित धाब्यावर आलुपराठ्यावर ताव मारून पुढे निघालो.



आश्चर्य म्हणजे शिरवळच्या आसपास हायवेला चक्क सर्विस रोड आहे. मी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्विस रोडने जाणं पसंत केलं, मात्र कुठे कुठे या रस्त्याविषयी शंका निर्माण होते. अशाच संभ्रमावस्थेत असताना मी एका मोटारसायकलवीराला हा रस्ता मुख्य हायवेला जावून मिळेल ना असे विचारले. तरूण सहजतेने म्हणाला 'सर्वच सर्विस रोड हायवेला जावून मिळतात'  दुनियेला कॉमन सेन्सच्या गोष्टी शिकविणाऱ्यालाच गुरू भेटला,
'कॉमन सेन्स इज खरंच नॉट कॉमन'  म्हणायची वेळ माझ्यावरच आली. सायकल चालवतानाच आमचं अच्छा टाटा बायबाय झालं !  तो एमायडिसी मधे शिरला. मी एखाद दोन  किमी पुढे गेलो असता तोच तरुण माझा माग काढत आला. माझ्या सायकल प्रवासामुळे त्याचे औत्सुक्य जागृत झाले होते, तरूण इस्लामपूरचा सिव्हिल इंजीनियर होता. माझी फेसबूक, इन्स्टा वरील माहिती त्याला हवी होती म्हणून त्याने मला परत गाठले. एकल सायकलसफरीचा प्रभाव किती आहे हे पुन्हा एकदा जाणवलं 

वाई मुक्काम

भर उन्हातून खंडाळा घाट पार करताना थोडी दमछाक जाणवली. विशेष करून माल वाहतूक करणाऱ्या एखाद्या  महाकाय वाहनामुळे जेव्हा  वहातूककोंडी होते त्यावेळी धूर, इंजिन्सची उष्णता, रस्त्याच्या बाजुचे तापलेले कडे आणि भरीला आपल्या सायकलची मुंगीची गती या सर्वांमुळे घुसमटल्या सारखे वाटते. एकदा घाटमाथा गाठल्यावर सुरुर फाटा, वाई रस्ता केव्हा येतो हे कळत देखील नाही.

वाईच्या दिशेने वळल्यावर लगेचच श्री घाटगे यांचे सदगुरू हँडिक्राफ्ट ( 9881592777)नावाचे दुकान आहे  येथे मातीपासून बनविलेली विविध प्रकारची भांडी आणि इतर कलात्मक वस्तू वाजवी दरात मिळतात.  या  ठिकाणाची माहिती मला शर्वरी मेहेंदळेने  दिली होती, अर्थात पर्सनल गुगल कामी आलं. सायकलवर वाहून नेता येईल एव्हढीच माफक खरेदी करून पुढे निघालो. वाई पर्यंतचा रस्ता सायकलिंगसाठी पर्वणी आहे अर्थात सुट्टीच्या दिवशी भरमसाठ रहदारीमुळे तो तितकासा आनंददायी वाटत नाही.

वाई मधे करंदीकर कुटुंबीय आपल्या  वडिलोपार्जित पुरातन वाड्यामधे घरगुती पद्धतीने रहाणेची सोय करतात हे माहिती होतं एकदा मी जावूनही आलो होतो परंतू रहाण्याचा योग आज जुळून आला. साधी, स्वच्छ रहाण्याची सोय आणि चविष्ट घरगुती जेवण तेही दोन अडिचशे वर्ष जुन्या वास्तूमधे, आणखी काय हवं ?  सायंकाळी नरोत्तम नाना फडणवीस यांच्या मेणवली येथील वाड्यात नतमस्तक होण्याची संधी सोडणं शक्यच नव्हतं. वाडा आणि परिसर दोन्ही छानच आहे, वाडयाची देखभालही केली जाते हे पाहून आनंद झाला. रात्री घाटावर कृष्णाईची आरती अनुभवली, घरगुती सुग्रास भोजनाचा आस्वाद घेवून झोपी गेलो.

पुस्तकांचे गाव भिलार

या मोहिमेतील माझ्या मनातील मुख्य आकर्षण पाचगणी-महाबळेश्वर या रस्त्यावरील सायकलिंग हे होतं, नियोजन देखील त्याच अनुषंगाने केलं होतं. 

पहाटे साडेपाचलाच वाड्यातून बाहेर पडलो हवा खूपच अल्हाददायक आणि थंड होती त्यामुळे उत्साह द्विगुणीत झाला होता. नाक्यावर वाई स्पेशल चहा ढोसला आणि घाट चढण्यास सुरवात केली. थंड हवामान, स्वच्छ सुंदर हवा, मर्यादित वहातुक यांमुळे बारा किमीची चढाई सहजच पार केली. घाट रस्त्याच्या चढाईची तीव्रता देखील कमी असल्याने त्याचाही फायदा झाला. वाटेत वेगवेगळी  झाडं, धायटी, रानजाई सारखी रानफुलं, झाडांमधून डोकावणारा उगवता भास्कर यांची विलोभनीय छबी मोबाईलमधे टिपली. घाटमाथ्यावर  'यारों की याद में'  दोन कप गरमागरम कॉफीचा आस्वाद घेतला आणि मार्गक्रमण सुरू ठेवले.

आमची सौ पुण्यामधे नियमीतपणाने सेंद्रीय फळं, भाज्या खरेदी करत असते. तिच्याच संपर्कातील भिलार येथील एक शेतकरी उमेश भिलारे ( 7385666021) यांचेशी संपर्क करुन त्यांचे शेत गाठले. निर्विष शेती करणे ही खरोखरीच एक कसरत असते, अनेक दृश्य अदृश्य आव्हानांना सामोरे जात हे व्रत पाळावे लागते. माझ्या दृष्टीने असे शेतकरीच खरे सेलिब्रिटी आहेत, त्याच भावनेने उमेशसह स्ट्रॉबेरी पिकासोबत सेल्फी काढला,  त्यांच्या दृढनिश्चयाचे कौतुक करून  निरोप घेतला. परत फिरल्यावर मुख्य भिलार गावातून येताना पुस्तकाचे गाव प्रकल्याच्या मुख्य कार्यालयाला भेट देण्याचा मोह टाळणे शक्यच नव्हते. दालनाला भेट दिल्यावर, शासनाने मनात आणले तर प्रशासन  एखादा चांगला प्रकल्प कार्यान्वयीत करू शकते, याची खात्री पटली.



मी प्रवासाचा आनंद लुटत असताना घड्याळ आपले काम चोख बजावत होते त्यामुळे मला आटपतं घ्यावं लागलं आणि महाबळेश्वर रस्त्याचा मोह टाळून वाईचा रस्ता निवडावा लागला. अर्थात पांचगणी वाई सायकल प्रवास म्हणजे घसरगुंडीवरून घरंगळत खाली येण्यासारखेच आहे. दोन वाजता वाई मुक्कामी आल्यावर आंघोळ करून मी नेहमी ज्याचा आळस करतो ते स्ट्रेचिंगचे धडे गिरवले आणि थोडावेळ विश्रांती घेतली.

मित्र असावा ऐसा

पुण्यात आल्यापासुन  मित्रमंडळ वाढतंच आहे, त्यातही सायकलप्रेमी दोस्त जरा अधिकच. असाच एक सदाउत्साही मित्र म्हणजे विनय तिनईकर !  आमच्या मंडळात तो वयाने लहान आणि लाघवी स्वभावाचा असल्याने आम्ही त्याला गुडबॉय म्हणतो. शनिवारी सुरुर फाट्यावर वळल्यावर  मी विनयला फोन करुन माहिती दिली आणि रवीवारच्या प्रवासाची कल्पना दिली. क्षणाचाही विलंब न करता 'सर मी उद्या तुम्हाला घ्यायला वाईला येतो तुम्ही एसटी बसने येवू नका' असे फर्मान काढले. त्याच्या निःसंदिग्ध आग्रहामुळे माझे बोलणेच खुंटले. लगेचच आखणी झाली आणि रवीवारी चार वाजता वाई स्टँडसमोर भेटण्याचे ठरले.

रवीवारी नियोजित वेळेत विनय हजर झाला पण आमचा अतिउत्साह नडला, होंडा सिटीची डिकी मोठ्ठी असुनही चाकं काढलेली माझी सायकल त्यात मावली नाही.  सायकलचे हँडल सोडवून नाईलाजाने सायकल पुढच्या आणि मागच्या सीट्स च्या मधे उभी केली, चाकं, पिशव्या, खरेदी सामान डिकीत ढकलले. विनयचे दोन मुलगे आणि मी,  मागच्या सीटवर घुसलो आणि परतीचा प्रवास सुरु केला. सायबाच्या थाटात वातानुकुलीत गाडीतून डुलक्या काढत घर कधी गाठले ते कळले देखील नाही.

संपूर्ण प्रवासात एकूण सतरा वेळा पैसे अदा करणेची गरज भासली, त्यातील फक्त दोन व्यवहार नकदीने केले उर्वरीत पंधरा व्यवहार डिजिटल अर्थात कॅशलेस पध्दतीने केले. भीम ऑप कार्यान्वयीत झाल्या दिवसापासून मी प्रयत्नपूर्वक डिजिटल पेमेंटचा आग्रह धरतो, आणि इतरांनाही प्रोत्साहित करतो.

लैस विथ कॅश ते लेस कॅश !

आणखी एक एकल आनंदयात्रा सुफल संपूर्ण झाली.

रामराम

मार्च २०२१














Monday, 30 November 2020

Solo Cycling In Karnataka कर्नाटक एकल सायकल सफर


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इथे या ठिकाणी !


सात आठ महिने घरी बसल्याने त्यामधेच आनंद शोधायला शिकलो पण माणसाचा मूळ स्वभाव जात नाही. बरेच दिवस 'कुछ करते है' अशी खुमखुमी येत होती, त्यातच मित्र विवेक मराठे हळूच कोस्टल कर्नाटकची सायकल सफर करून आल्याने बेचैनी आणखी वाढत होती. माझी ही पहिली एकल आत्मनिर्भर सहल होणार अशी लक्षणं दिसत असल्याने मनात थोडी धाकधुक होती. कुठेतरी जायचं हे नक्की होतं पण कुठे? हा प्रश्न होताच. आमचं आवडतं राज्य म्हणजे कर्नाटक ! पण त्यातही नेहमीचे भाग टाळून जाण्यायेण्यास सुकर असा इलाका निवडावा या विचाराने मार्ग ठरविला,
पुणे- कुरुंदवाड -वाडी -चिक्कोडी- मुधोळ- बागलकोट- अलमट्टी- ऐहोळ- पट्टडक्कल- बदामी- गोकाक -बेळगावी


अर्थात स्वारगेटहून पहाटे चारपासून कुरुंदवाडच्या बशी आहेत याची चौकशी प्रत्यक्ष तिथे पहाटे जावून केली आणि मगच हा मार्ग निवडला.


मार्ग ठरविल्यावर माहिती गोळा करणे सुरु केले, पर्सनल गुगल कामी आले. श्री.शशांक मेहेंदळे ( 9823276832) यांचे संदर्भाने श्री.अनिकेत बाळ (98224 33255) यांचेशी ओळख झाली, ते गेली सोळा सतरा वर्ष याच भागात सहली आयोजित करत आहे. श्री. बाळ यांनी कोणताही आडपडदा न ठेवता इत्यंभूत माहिती दिली. प्रत्यक्ष सफरी दरम्यान जवळपास रोजच त्यांचेशी सल्लामसलत होत होती.
श्रीगणेशा

नेहमीची ठरलेली तयारी करण्यासाठी मित्रपरिवाराची मदत घेतली, प्रवासात गरज पडू शकतील असे सुटे भाग जमा केले. स्वारगेटला पहाटे चारचं कुरुंदवाड फ्लाईट पकडलं तत्पूर्वी सायकल लोड करण्याचे काम करून घेतले. मजलदरमजल करत अकराच्या आसपास कुरूंदवाड गाठलं, गाडीच्या टपावर चढून सायकलही लँड केली. गावात आमचा महाविद्यालयीन मित्र डॉ.उमेश लंबे (98508 66588) याची भेट घेतली. त्याच्या आग्रहाखातर त्याच्यासोबत नाष्टा करुन नरसोबावाडीचा रस्ता पकडला. मंदिर आवारात मुखपट्टी वापराच्या आदेशाचे कसोशीने पालन करून घेतले जात होते. गृहलक्ष्मीला खूश करप्यासाठी अशी मंदिरपर्यटनासारखी छोटीशी कृती फार प्रभावी ठरते. दर्शन घेवून दुपारी दोनचे आसपास चिक्कोडीच्या दिशेने मार्गस्थ झालो.
जोडोंका दर्द

कुरुंदवाड कोल्हापूर जिल्ह्यात येत असले तरी सांगली पासून जवळ आणि कर्नाटक हद्दीलगत आहे. चिक्कोडीचे अंतर चाळीस पंचेचाळीस किमीच असल्याने भर दुपारी दोन वाजता सायकलिंगला सुरवात केली. उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता पण सुंदर रस्ता आणि दुतर्फा उसाची लागवड यामुळे थोडं सुसह्य वाटत होते. राज्याच्या वेशीजवळ आल्यावर चित्र एकदम पालटले रस्ता अचानक खडबडीत झाला, दोन राज्यांच्या सीमेवरील जोडोंका दर्द चांगलाच जाणवला त्यात भर भाषेची पडू लागली, हळूहळू सहज सुलभ मराठी संवाद कमी होउ लागला.

आपल्याकडे जशी गव्हर्मेंट गेस्ट हाउसेस असतात तसे कर्नाटकामधे आय. बी. अर्थात इन्स्पेक्शन बंगलो असतात याची माहिती मित्र अमित मोने (070212 14496) कडून मिळाली होती. सायकलसफर म्हणजे पैशाचा धूर ही संकल्पना मनाला कधीच पटली नाही त्यामुळे आय.बी. ला प्रथम प्राधान्य. गावात शिरल्यावर चौकशी करत आयबी गाठले. आवार मोठा आहे, सर्वत्र अनेक मोठ्या गाड्या लागलेल्या होत्या आणि जोरदार धामधुम सुरू होती.

माझ्याकडे लक्ष देण्यात कोणालाच गम्य नव्हते मी थेट आत घुसून एका अधिकाऱ्याला दिमाखात 'मी सायकलवर आहे रहाण्याची सोय होईल का ?' असे विचारण्याचा प्रयत्न केला, तो ढिम्म. शेजारी उभा असलेला कर्मचारी त्याच्याशी काहीतरी कानडीत पुटपुटला, अधिकारी झिडकारण्याच्या स्वरात 'नो रूम' असे बोंबलला. मी पिच्छा सोडलाच नाही, शेवटी माझी दया येउन त्याने मला एका खोलीत नेले त्यात दोन कॉट होते त्यातील एक मला देवू केली, संडास बाथरूमचा पत्ताच नव्हता.

मी थोडा स्थिरस्थावर झालो तो पर्यंत बाहेरील लगबगही कमी झाली होती. मी पुन्हा त्याला गाठून भाषेचे अडसर पार करत शंभर रूपयाची ऑफर दिली, पुन्हा दुर्लक्षच, क्षणभराने म्हणाला रूम रिपेरिंग - मी समजलो त्याने सायकलवाल्यांचे पाणी जोखले होते, हे फुकटे काही कामाचे नाहीत अशीच त्याची देहबोली होती. अर्थात मला काहीच फरक पडणार नव्हता, हम है राजा राज करे..... त्या खोलीत माझा संसार मांडला. आवाराच्या समोरच एक शाकाहारी हॉटेल आहे तिथे कर्नाटकी खाद्याचा सिलसिला सुरु केला. पहाटे चार वाजता उठून होल वावर इज अवर हा नियम विधींकरिता अंमलात आणला, थोडा फार व्यायाम केला. माझ्या शेजारच्या कॉटवर झोपलेल्या मुलाला उठवून निघण्याची सूचना दिली, कृतज्ञता म्हणून त्याच्या खिशात पन्नास रुपये कोंबले; मी याचे एंपथी एक्सपेंन्स असे नामकरण केले आहे. ठीक साडे पाचला टपरीवर चहा पिऊन मार्गस्थ झालो..









                                                                                                                                                     
                                                             
नॉस्टलजिक  

शिरविजेरी (हेड टॉर्च) लावून सुंदर सुळसुळीत रस्त्यावरून आल्हाददायक वातावरणात सायकलिंग सुरु केले. चिक्कोडीतून बाहेर पडल्या पडल्या एक छोटासा घाट वजा चढाव लागतो तो चढत असताना विजेरीच्या प्रकाशाने उंचावर असलेला दिशादर्शक फलक चमकू लागला मला मज्जा वाटली, मी काळोखातच लगेच फोटो काढला. पुढे पुणे सारख्या शहरात जसे पहाटे व्यायामासाठी फिरणारी मंडळी दिसतात तसे तिकडेही पाहून आनंद झाला.
जवळपासच्या भागात साखर कारखाने आहेत आणि सध्या उस तोडणी हंगाम सुरु आहे त्याचा प्रभाव रस्त्यावर जाणवत होतो. दोन तीन ट्रॉल्या जोडलेले ट्रॅक्टर पुण्यातील डीजे ला तोंडात मारतील एव्हढ्या मोठया आवाजात गाणी लावून आसमंत दणाणून सोडतात, गाणी साधारण अर्धा किमी अंतरावरूनही सहज कानी पडतात. गाणी एकतर कुमार सानु फेम- नव्वदच्या दशकातील किंवा कन्नड ठसकेबाज आणि दोन्हीत झंकार बीट्स अनिवार्य,

मी ही कॉलेज जीवन आठवून काही क्षण त्या तालावर डोलत सायकल हाणायचो. पण या बेधुंद ट्रॅक्टर चालकांचा रस्त्यावर जणू हैदोसच, एक प्रकारची दहशत. माझ्या हेल्मेटला देखील एकदा ट्रॉलीतून डोकावणाऱ्या उसाचा फटकारा बसला. पुढे मुधोळला लॉज मालकाने मला सांगितलेच- संध्याकाळ झाल्यावर सायकलने बाहेर पडू नका, हे ट्रॅक्टरवाले फूल्ल टू असतात. त्यामुळे मुधोळ मधील मुधोळ हाउंड या प्रसिद्ध कुत्रा प्रजातीचा ठावठिकाणा लावण्याचा माझा मनसुबा विरला.

मुधोळपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उसाची प्रचंड शेती आहे, तुरळक कुठेतरी मका, आलं, हळद यांची लागवड दिसली. एकेकाळचा दुष्काळी प्रदेश कालव्याच्या पाण्यामुळे शेतीमधे समृध्द झाला आहे.
सहन होत नाही आणि सांगता येत नाही

पहिल्या दिवशी दुपारनंतरच्या सत्रात चाळीस पंचेचाळीस किमी, मग मुधोळपर्यंत आणखी ऐंशी पंच्याऐंशी किमी सायकलिंग झाले होते. मुधोळनंतर पीक पध्दत थोडी बदलेली जाणवत होती, रस्त्याच्या कडेला कुठे कुठे ओसाड जमीन दिसु लागली होती. उसाव्यतिरिक्त डाळिंब, चिकु, पोपया या झाडांची लागवडही पहाणेस मिळाली. असे असले तरी रस्ता तसाच, अनंत अमर्याद सरळ, चढ आहे की उतार आहे हेच कळत नाही त्यामुळे पेडलिंगला उसंतच नाही. ना चढाईच्या कष्टातला आनंद न उतराईच्या घसरगुंडीचे सुख. एकुणात सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्था.

याच रस्त्यावर मुद्दापूर क्रॉसवर हायवे पासुन पाच सहा किमी आत जे. के. सिमेंटचा कारखाना आहे. निघाल्यापासून हा पहिलाच मोठा प्रकल्प पहाण्यात आला. बहुदा याचमुळे या भागात चकाचक लांबसडक महामार्गांच्या दुतर्फा महाराष्ट्रासारखे व्यापारीकरण झालेले दिसत नाही आणि म्हणुनच आमच्यासारख्या हौशी सायकलवीरांना इकडे जास्त आनंद मिळतो.

लोकापूर नाक्यावर मस्त नाष्टा करून निघालो आणि लगेचच मागील चाक वेडंवाकडं फिरत असल्याचे जाणवले, थांबून पाहिले तर हवा कमी झाल्याचे जाणवले. नशीबाने तिथेच शेजारी पंक्चरवाला होता त्याचे कडून काम करून घेतले. पाच सहा किमी जातो न जातो तो पुन्हा तेच ! आता मात्र आत्मनिर्भर. शेतात सावलीत सायकल उलटी करून ट्यूब बदलली, संधीचा फायदा घेवून सायकल साफ करून तेलपाणी केले आणि मार्गस्थ झालो. थोड्या अंतरानंतर पंक्चर काढून घेतले, या प्रकरणात दोन तास गेले. बागलकोट गाव खूप गजबजलेले आणि मोठ्ठी बाजारपेठ असलेले आहे. गावाचे बाहेर खूप मोठा जलाशय दिसतो त्यामधे गळ्यापर्यंत बुडलेले माड -नारळाची झाडं पहायला मिळाली. वाटेत पुढे दगडात कोरीव काम करत बसलेले कारागीर दिसले अतिशय निगुतीने मन लावून त्यांचे काम सुरू होते.
सदा सुसज्ज
सायकल सफर सुरु केल्यापासून अलमट्टी धरण पहाण्याची इच्छा मनात होती. बागलकोटनंतर मुख्य रस्त्यावरून अलमट्टीकडे जाणारा रस्ता लागतो. नाक्यावर थोडे उदरभरण करून अलमट्टीची दिशा पकडली. हा रस्ता झाडी असलेला आणि थोडा फार चढउतारांचा आहे तसेच मातीचा रंगही लालसर असल्याचे जाणवू लागले.

आतापर्यंतच्या प्रवासातील भौगोलिक स्थितीपेक्षा हे सर्व वेगळं होतं. पंक्चर प्रकरणात दोन तास गेल्याने मला थोडी चिंता वाटत होती कारण अलमट्टीमधे रहाण्याच्या हॉटेलची नीटशी माहितीही मिळवू शकलो नव्हतो. आज रामलल्लाच्या भरोशावर मार्गक्रमण सुरू होते, वाटेत सतत चौकशी सत्र सुरु होतेच. एका गावात एक तरूण जोडगोळी भेटली त्यांनी अलमट्टीपूर्वी सीतिमणी भागात एक मंदीर आहे तिथे तुमची सोय होईल असे सांगितले. माहिती अचूक ठरली, श्रीमाता कल्याणताई धर्मरमठ अशी पाटी दिसली, आत शिरून स्वामीजींशी संपर्क केला त्यांनी देवळात झोपण्यास अनुमती दिली.
जय्यत तयारी कामी आली, बॅगेतली प्लास्टिक पन्नी काढून आंथरली, कपडे वाळत घालण्यासाठी दोरी बांधली आणि सामान मांडामांड केली. मठाच्या आवारातील आठदहा वर्षांची पाचसात पोरं माझ्या वाटोळी जमली. माझा सर्व अवतार पाहून त्यांचे कुतुहल जागृत झाले, आपापल्या परीने जो तो माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. माझ्यासोबत चिक्कू होते ते सर्वांना एकेक दिल्यावर मुलं खुश झाली, आणि पसार झाली. मंदिर आवारातील टाकीच्या नळावर आंघोळ केली. धोबी घाट घातला आणि निश्चिंत झालो. स्वामीजींनी त्यांच्या घरी चहापानासाठी बोलावले तिथे थोड्या गप्पा झाल्या, त्यांनी मंदिराची माहिती दिली. मी देवळात परत येवून झोपी गेलो.

हागणदारी युक्त

स्वामीजींच्या सूचनेनुसार पहाटे प्रथम सीताराम मंदिराला भेट दिली, मंदिर डोंगरमाथ्यावर आहे तिथून अलमट्टी धरणाचे विहंगम दृश्य दिसते. धरणाची छबी मोबाईल मधे टिपली आणि प्रवास सुरू केला. गावातील रस्त्याने पुढे आल्यावर एक तिठा लागतो तिथून उजवीकडे गेल्यावर महामार्ग लागतो. रस्ता नेहमीप्रमाणे सुंदर होता, जोशात सायकलिंग सुरु होते. मी रात्रीचे जेवण संध्याकाळीच करत असल्याने सकाळी लवकर भूक लागते. पोटात कावळे ओरडू लागले होते आणि महामार्गावर हॉटेलचे नामोनिशाण दिसत नव्हते, माझी चिडचिड होवू लागली होती. एका गावाकडून महामार्गाकडे येणारा छोटा रस्ता दिसत होता, तिकडून एक आज्जी बकऱ्या हाकत येत होती, मला आशेचा किरण दिसला मी हॉटेल, काना, इडली असे म्हणत, सोबत विविध हावभाव करून माझ्या भावना पोचविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. आजीने गावाच्या दिशेने बोट दाखविले.

मी आनंदाच्या भरात सायकल देवलापूर गावाच्या दिशेने वळवली. मी वेशीच्या जवळ गेल्यावर प्रातःसमयी रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या पोराटोरांची एकच धावपळ उडाली, विधी पूर्ण करण्यासाठी चड्डया सावरत सर्व शेजारील शेतात पळाली. खरं तर गेले दोन-तीन दिवस मी रोजच महामार्गाच्या दुतर्फा हे पहात आलो होतो, फक्त पळापळी आजच पाहिली. गाव जागवतच मी प्रवेश करत होतो, रस्त्याच्या कडेला कोणी चुळा भरतंय, कोणी दात घासतंय, कोणी तोंड धुतंय, कोणी भांडी खंगाळतंय अशी सकाळची आवराआवरी सुरू दिसली.

हॉटेल काही दिसेना, एक दोन फूट बाय पाच फूटाचे झापड असलेली साधारण सात बाय सात फूट मापाची बंद झोपडी दिसली अंदाज करुन आत डोकावून खाण्याची खूण केली त्याने खुणेनेच पुढे जा सांगितले. पन्नास फूटावर पुन्हा तेच दृश्य, माझा तसाच प्रश्न त्याने हातानेच दहा पंधरा मिनिटं लागतील असे खुणावले. मी आणखी पुढे गेलो पुन्हा एक तशीच झोपडी दिसली मी थांबून चौकशी करणार तोच माझ्या वाटोळं पाच पन्नास गावकऱ्यांनी कोंडाळं केलं. एखादा परग्रहावरून आलेला प्राणी असावा अशा आविर्भावात त्यांच्या भाषेत ते कुजबूज करत होते, क्षणभर मी गोंधळूनच गेलो.
झोपडीच्या छोट्या दारातून मालक बाहेर आला आणि मला चहा ऑफर केला, मला हुश्श वाटलं, कोई तो है... मी खाण्याविषयी विचारणा केली, पुन्हा खुणेनेच त्याने दहा मिनिटं असं उत्तर दिलं. माझ्याकडे थांबणे हा एकच पर्याय शिल्लक होता, मी तेच केलं. दरम्यान जमलेल्या जनसमुदायाशी संवाद साधण्याचा क्षीण प्रयत्न करत होतो. दहा मिनिटांना दोन वाट्या भरतील एव्हढा गरमागरम उपमा माझ्या समोर आला, त्याचा आस्वाद घेतला. झोपड्यात वाकून पाहिलें तर एका मोठ्या घंगाळ्यात पोहे-भेळ सदृश काहीतरी खाद्य दिसले. ते एक प्लेट पार्सल करून घेतले, तो गिरमीट नावाचा भाजक्या पोह्यांची भेळ कालवून त्याला फोडणी देवून बनविलेला फक्कड असा लोकल पदार्थ होता. दोन प्रकारचा अल्पोपहार, तीन चहा आणि बिलाची रक्कम नक्त एकोणतीस रुपये, अविश्वसनीय !


First Maker of Kardant

देवलापूर मधील रम्य आठवणी साठवून मार्गक्रमण सुरू केले. श्री.बाळ यांनी कुडाल संगम पहाच अशी सूचना केली होती त्यामुळे तो पाहिला. कुडाल संगम म्हणजे जणु सागरच- कृष्णा आणि मलप्रभा नदीचा एवढा महाकाय विशाल संगम असेल अशी कल्पनाही मी केली नव्हती. तिथुनच ऐहोळे येथील मयूर यात्री निवासच्या मंजुनाथ (9591164103) यांचेशी संपर्क करून ऐहोळे गाठण्याचे ठरविले. आमिनगड तिठा येण्यापूर्वी एका फलकाने माझे लक्ष वेधले.

फलकावर वरील भागात विजया लिहिलेले त्याखाली एका खानदानी दाक्षिणी आजोबांचा फोटो आणि त्याखाली First Maker Of Kardant अशी ठळक ओळ. बराच वेळ त्याचा अर्थ लावण्यात गेला कारण आपल्या मनात करदंट म्हणजे गोकाक/ बदामी हेच कोरलेले असते. या आमिनगडात त्याचा उद्गाता हा धक्काच ! गावात अस्सल करदंट मनसोक्त खाल्ला आणि गुडूर फाट्यावर डावीकडे वळलो. पुढे याच रस्त्यावर उजवीकडे ऐहोळे फाटा आहे. निघाल्यापासून खराब रस्त्याचा सामना करावा लागला नव्हता त्याची कमतरता आज भरून निघाली.
मयुरा यात्री निवासचा परिसर खूप मोठा, बाग बगिचा असलेला आणि हवेशीर आहे. खोल्याही प्रशस्त आहेत, इतक्या की मी माझी सायकल खोलीतील ड्रेसिंग एरियामधे उभी करू शकलो !                                                                विलोभनीय वारसा !
कर्नाटकमधे पुरातन वास्तु, मंदिरं, वारसास्थळे पहाण्यासाठी जाणारी मंडळी नेहमी हंपी-बदामी असा जोडीने उल्लेख करतात. हे म्हणजे मुंबई-पुणे या दुकलीचा एकत्र उल्लेख करण्यासारखे आहे. हंपी आणि बदामी यातील जवळात जवळच्या मार्गाने अंतर एकशे चाळीस किमी आहे. असो,
भारतात पर्यटनासाठी फिरणाऱ्या व्यक्तीने ऐहोळे, पट्टडक्कल, बदामी या ठिकाणी आयुष्यात एकदातरी गेलेच पाहिजे आणि हे पाहिल्याशिवाय निव्वळ सामाजिक प्रतिष्ठेकरिता परदेशवारीचा विचारही करू नये असे माझे स्पष्ट मत आहे. येथील वारसा स्थळांचे वर्णन शब्दात करण्याची कुवत माझ्यात नाही. मी एव्हढेच म्हणेन ते पहाताना माझ्या डोळ्यात पाणी आले.

मित्र विवेक मराठे याने बदामी विषयी अनेक सूचना केल्या होत्या, त्यांचे पालन करत तेथील गुहा, किल्ला, त्यावरील मंदिरं, वास्तु, पुरातन संग्रहालय सर्व मनसोक्त अनुभवले. गुहांमधील दगडातील कोरिव काम पाहून दिग्मूढ झालो, त्यांची छबी मोबाईलमधे टिपण्याची माझी हिम्मत होत नव्हती, केवळ उपचार म्हणून चार पाच फोटो काढले. या सर्व परिसरात फिरताना प्रत्येक पावलागणित ते अनामिक कारागीर आणि तेव्हाची राजघराणी यांचे विषयी आत्यंतिक आदराची भावना उफाळून येत होती.

बदामीमधे पोलिस स्टेशन शेजारी महाकुटेश्वर नावाचे एक छोट उपाहारगृह आहे तेथील अन्नाची चव, परिमाण, तेथील स्वच्छता आणि आकारली जाणारी किंमत यांचे अतिशय व्यस्त प्रमाण होते. वीस रुपयामधे पोटभर नाष्टा. दुपारच्या वेळी एक लिंगायत खानावळी गाठली, तेथील जेवण इतकं तिखट होतं, मी भाजी आमटीत पाणी ओतून थकलो, थाळयात तळच तयार झालं. थाळ्यात जर फिशकरी असती तर माशांनी पोहण्याचा आनंद लुटला असता. एकुणात बदामीमधील खाण्याचा अनुभव संमिश्र असाच होता.
सिल्क साडी साठी प्रसिद्ध इल्कल गाव ऐहोळेपासून जवळच आहे. गृहलक्ष्मीला खुश करण्याची नामी संधी साधून सरोदे सिल्क मिल ( 9448924761) यांचे दुकानात खरेदी केली.

सोलोमुळे संधी

बदामी स्टँड समोर न्यु सन्मान डिलक्स ( 09448729741 )हे अतिशय स्वच्छ, सुंदर, छोटेखानी खोल्या असलेले किफायतशीर लॉज आहे. तिथे दोन दिवस राहून नेहमीप्रमाणे पहाटे साडेपाचला टी पॉईंटवर चहा ढोसून मार्गस्थ झालो.

हवा छान अल्हाददायक होती त्यामुळे सायकल चालवताना मज्जा येत होती. भुकेची जाणीव झाल्यावर संशोधन सुरू केले, पुढे कुलगिरी क्रॉसवर नमुनेदार कर्नाटकी खाउगाडी दिसली. वाफाळणाऱ्या इडल्या आणि तळणीत तरंगणारे मेदुवडे माझी वाटच पहात होते त्यांचा अवमान करणं मला पटणारे नव्हते त्यामुळे त्यांचा आस्वाद घेतला.
गाडीपाशी उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीने आग्रहाने मला चहा प्यायला दिला, प्रवासादरम्यान लोकांच्या प्रेमाने मी भारावून गेलो.

रामदुर्ग रस्त्यावर मुदकवी या गावात एक मोठा बुरुज आणि त्यावर फडकणारा भगवा झेंडा दिसला. मला आमचे गुरु श्री आनंदराव पाळंदे (094235 68776 ) आणि मित्र विवेक मराठे (09822016415) यांची आठवण झाली आणि सायकलची चाकं आपोआप त्या दिशेला वळली. मोठ्ठाले बुरूज आणि खूप पसरलेली तटबंदी पहावयास मिळाली- पण एकुणात सर्व अनास्थाच, स्थानिकांनी त्याचे नाव ब्रिटिशर कोटी असे सांगितले, प्रत्यक्षात बांधकाम खूप पुरातन असल्याचे जाणवत होते.

माघारी फिरल्यावर मला विणकामाच्या यंत्रांचा आवाज ऐकु आला, चौकशी करत एका घरगुती लूमपर्यंत पोचलो. प्रत्यक्ष विणकरांकडून ( गिरीअप्पा 6362940566 )साडी घेताना मला गंमत वाटली पण त्या विणकराच्या चेहऱ्यावरील आनंद मला जास्त सुखावून गेला. रामदुर्गच्या आसपास असेच आणखी एक दुर्लक्षित ठिकाण पहाण्यास मिळाले, तिथे म्हणे शिवाजी महाराजांच्या काळी तुरुंग होता. तसेच शेजारील भूतनाथ आणि अन्य सुंदर अशी पुरातन मंदिरही बघता आली. एकटाच असल्याने वाट वाकडी करून वेळेचा विचार न करता हे पहाता आले.


रामदुर्ग ते यरागट्टी क्रॉस रस्त्याने माझा जीव काढला, खराब रस्ता- त्यात रस्त्याची कामं म्हणजे संपलच. उन खूप तापले होते, दुपारचे तीन वाजल्यावर माझी सहनशक्ती संपत आली आणि बेळगावीचे वेधही लागले म्हणून सायकलिंग न करता काही जुगाड जमवून बेळगावी गाठण्याचे ठरविले. पाच पन्नास वहानांना विनंत्या केल्यावर एका टेंपोवाल्याला माझी दया आली.

बेळगावी पोचल्यावर मित्र विनय तिनईकरच्या ( 098 90 175666 ) घरी जावून त्याच्या आईच्या हातच्या उपवासाच्या सुग्रास पदार्थांचा आस्वाद घेतला आणि मन तृप्त झाले. नंतर दोन व्यवसायिक भेटी घेतल्या आणि हॉटेल अनुपम येथे बेळगावीमधील अट्टल सायकलवीर राजु नायक (099025 21116 ) आणि संतोष शानभाग यांचेशी चर्चासत्र झडले.

रात्री सव्वाअकराची स्लीपरकोच गाडी पकडून सही सलामत घर गाठले.


असंही असतं!

संपूर्ण प्रवासात मा. मुख्यमंत्री अथवा अन्य राजकारणी यांची फ्लेक्सबाजी कुठेच दिसली नाही. आपल्याकडे विविध आस्थापनांमधे मालकांचे फोटो दादा, भाऊ, आण्णा, काका, काकासाहेब यांचे सोबत लावण्याचा प्रघात आहे, तिकडे मात्र मालकांचे फोटो धर्मगुरू, शास्त्री, गुरुजी यांचे सोबत झळकलेले दिसले.

सुळसुळीत महामार्ग, वहातूक कमी तसेच रस्त्याच्या दुतर्फा बाजारीकरणही अत्यल्प जाणवले. उत्तम दर्जाचे दोन इडली- दोन मेदुवडे आणि मनसोक्त चविष्ट चटणी-सांबार, स्वच्छ टापटीप जागेसह फक्त वीस रूपयामध्ये उपलब्ध.

स्वच्छता आणि चवीकरिता नो एक्स्ट्रा प्रिमिअम.

असं ही असू शकतं ! धन्यवाद.














संपादन- विवेक मराठे

दिनांक १९ ते २६ नोव्हेम्बर २०२०पर्यंत
एकूण सायकलिंग ४५० किमी. अंदाजे
 
खर्च    ६ हजार मात्र.

Wednesday, 14 October 2020

Bamboo Fencing बांबू कुंपण

 

                                   स्वप्न साकार !

 


हल्ली अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा विषय वादाचा बनविला गेला आहे, मात्र प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पहाण्याचे स्वातंत्र्य वादातीत मानले जाते. कोणते स्वप्न पहावे याची काही नियम नियमावली माझ्या तरी ऐकिवात नाही. कोणी घराचे स्वप्न पहातो/पहाते तर कोणी आलिशान गाडीचे तर कोणी सत्ताप्राप्तीचे. माझ्या मते ही सर्व स्वप्न सरधोपट ( कॉमन) अशीच आहेत.

आमचा मित्र विवेक मराठे अशी सामान्य स्वप्न पहात नाही. स्वप्नाची इश्टोरी सुरू होते मेघालयातून !  तीन वर्षापूर्वी आम्ही मेघालयात  स्वनिर्भर आणि स्वैर सायकलिंग केले. तिथे दैनंदिन जीवनात बांबूचा वापर प्रचूर मात्रेत केला जातो. टोप्या, टोपले, टोपल्या, घरासाठी कुंपण, नाल्यावरील सेतू पासुन ते होम स्टे साठीची खोली बांबू पासून बनविली जाते. अशा एका होम स्टे मधे आम्ही राहिलो देखील. तेथील ग्रामजीवन आम्ही अगदी जवळून अनुभवले आणि विवेकला बांबूच्या वापराची स्वप्न पडू लागली. मेघालायातून परतल्या पासून महिना-दोन महिन्यांनी त्याचा बांबूजप सुरू असे. 
पुण्याला आमचे अंगणात बांबूचे बन फोफावले आहे, त्याचा सदुपयोग करण्याचा किडा विवेकच्या डोक्यात वळवळत होता. प्रथम आम्ही एक चौपाई बनविली नंतर एक झोकदार बाकडंही बनविलं पण त्याचे समाधान होत नव्हतं. त्याचे स्वप्न होतं घरासमोर मेघालय पद्धतीचे बांबूचे कुंपण !
 बांबूचे तोडकाम, चिरकाम केले, घरासमोरील मोकळ्या जागेची मोजमापे काढली आणि त्याला योग्य आकाराचे चिरलेले तुकडे आणि उभे पुरण्यासाठी डांब तयार केले. हे सर्व करत असताना  अधुन- मधुन वरुणराजाची कृपा सुरु होतीच तिकडे कानाडोळा केला. तयार झालेली सामग्री  महिनाभर वाळू दिली मग त्याला  किटकरोधकाचे लिंपण करून ठेवले. 
                         

अखेर मुहूर्त निघाला, प्रत्यक्ष काम सुकर व्हावे म्हणून विवेकने आदल्या सांयंकाळी बांबूचे डांब  सिमेंट- वाळूच्या सहाय्याने पत्र्याच्या डब्यात उभे करून  ठेवले. सकाळी साडेसात वाजता कामाला सुरवात केली. पहार, फावडं, थापी, कोयता, कात्री, सुरी  ड्रिल मशिन ई अवजारे आणि बांधण्यासाठी सुतळी असा जामानिमा आधीच सज्ज  करून ठेवल्याने कामाला गती आली. कामगारांना घरमालकिणीने  चहा अल्पोपहार आणि काम संपल्यावर भाकर तुकडाही प्रेमादराने दिला त्यामुळे समाधान वाटले, आता मेहनताना मिळण्याच्या प्रतिक्षेत !

अंगमेहनतीचे काम करणे हे आजकाल कमी  दर्जाचे मानणारे स्वतःला उच्चभ्रू म्हणवून घेतात त्यातच त्यांना मोठेपणा वाटतो. कोणत्याही कामास कसब, बुध्दी आणि चिवटपणाची गरज असते, हे ती कामं हातावेगळी केल्याशिवाय कळणार नाही.

कष्टाच्या कामाने आलेल्या घामाला दुर्गंधी नसते. कष्टाचे मोजमाप अर्थनिर्मितीशी जोडण्यापेक्षा आनंद निर्मितीशी जोडण्यास आपण कधी शिकणार ?

            विवेकची मुलगी सृष्टी म्हणते त्या प्रमाणे,  हे -

                      SWEET SWEATING !

 स्थळ :

 सृष्टी अनघा विवेक मराठे,

 ३५ नारायण पेठ, पुणे.

Sunday, 13 September 2020

मास्कचे महात्म्य

 




मास्कबाबत बोलू काही !

पुणे... स्वत:ची अस्मिता, स्वत:चा विचार करण्याची क्षमता असण्याचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांचं शहर... सहाजिकच कोणीतरी सांगितलं म्हणून सहजपणे ऐकणाऱ्यांपैकी आम्ही नाही...मग तो मास्क असो की हेल्मेट !

सध्या मास्कबाबत हा लेखनप्रपंच

मुळात मास्क का वापरायचा? याचं सर्वात कॉमन उत्तर म्हणजे पोलिसाला ५०० रुपये दंड ऊगाच द्यावा लागू नये म्हणून... असं येईल... खरी गल्लत येथेच होत आहे... 

आपणा सर्वांना माहीत आहे की मास्क वापरायचं खरं काम शल्यविशारदांचं... ते का बरं मास्क वापरतात ?  तर १९०२ साली फिलाडेल्फिया येथे एक शस्त्रकर्म चालू असताना काही वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की सर्जन लोक बोलत असताना त्यांच्या थुंकीचे सूक्ष्म कण ऑपरेशनच्या जखमेत पडत आहेत... यावर आणखी संशोधन होऊन तथ्य आढळल्यावर मास्क वापरण्याची पद्धत पडली... 

आपल्याही बोलण्या, खोकण्या, शिंकण्यामधून उडणाऱ्या थुंकीच्या कणांमधून व्हायरसचा संसर्ग पसरण्याची शक्यता असते.... ते कण पसरू नयेत, तिथेच शोषले जावेत म्हणून मास्क. म्हणजे मास्कचं मुख्य काम आपल्यामुळे इतरांना संसर्ग होऊ नये हे असून दुसऱ्यामुळे आपल्याला संसर्ग होऊ नये हे उपकथानक आहे (ते ही महत्त्वाचं आहेच)... हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे

आता प्रश्न येईल की, मला तर काहीच होत नाहीये, मग मी का मास्क वापरू ? 

मला त्रास होत नाही म्हणजे मला इन्फेक्शनच नाही असं काही जरूरी नाही... इन्फेक्शन असूनही लक्षणमुक्त असणाऱ्या रुग्णांचंच प्रमाण प्रचंड आहे, हे वेळोवेळी होणाऱ्या सीरोसर्व्हेमधून समोर येत आहे... खरं तर हा नवीन आजार असल्याने त्याबद्दल निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही, संशोधनातून मिळणाऱ्या निरीक्षणांमधून गाईडलाईन्स बनत आहेत.. त्या कधीकधी बदलत असलेल्या दिसल्या तरी, सध्या त्या काटेकोरपणे पाळणं हेच आपलं कर्तव्य आहे... लक्षणमुक्त रुग्णांकडून व्हायरसचा प्रसार होतो की नाही याबद्दल अजूनही नक्की माहीत नसलं तरी, होत असावा असं मानण्यासही जागा आहे... त्यामुळे खबरदारी म्हणून मास्क वापरणं श्रेयस्कर... 

आपल्याला जर समजलं की उद्या नळाला कदाचित् पाणी न येण्याची शक्यता आहे... मग अशा वेळी आपण काय करतो ? खबरदारी म्हणून पाणी भरून ठेवतोच ना? तसंच इथेही करायचं आहे... मास्क वापरायचा आहे... 

आणखी एक प्रश्न असतो की, खुल्या हवेत, विशेषतः व्यायाम करताना मास्क वापरायचा की नाही ? तर अशावेळी सुद्धा मास्क आपल्या तोंडावर तरी असायलाच हवा... आजूबाजूला ६ फूट अंतरापर्यंत कोणी नसेल तर नाकावर नाही ठेवला तर चालेल... समोरून कोण येत असेल तर नाकावर चढवावा नंतर पुन्हा खाली करून तोंडावर ठेवावा... 

दोन माणसांपैकी एकाने मास्क वापरला तर इन्फेक्शनचा धोका ५० टक्क्यांनी कमी होईल... दोघांनीही वापरला तर ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात धोका कमी होईल... 

आपले पोलिस बांधव केले ५-६ महिने प्रचंड तणावात काम करत आहेत... हजारो बांधव केवळ आपल्यासाठी कर्तव्य बजावत असताना आजारी पडले आहेत, काही शहीदही झाले आहेत. आपण मास्क घातला आहे की नाही हे बघत बसणं हे खरं तर त्यांचं काम नाही, पण आपल्या बालिशपणामुळे आपण त्यांचा भार विनाकारण वाढवत आहोत, त्यांचा संसर्गाचा धोकाही वाढवत आहोत आणि वर दंड घेतला म्हणून त्या़ना नावेही ठेवत आहोत... हे दुर्दैवी आहे... 

सध्या कोरोनाची परिस्थिती भीषण होत चालली आहे, बेड मिळणं अवघड झालंय, मिळाला तर ऑक्सिजन मिळणं अवघड... व्हेंटिलेटर तर त्याहून दुष्प्राप्य.  त्यात कहर म्हणजे हा आजार घरात एकट्यालाच होत नाही, अनेका़ना होतो... एकदा रुग्ण रुग्णालयात गेला की त्याची प्रत्यक्ष भेटून विचारपूस करणं शक्य नाही, त्याला घरचं जेवण बिवण पण नाही... रुग्णालयात जे देतील ते खायचं असा सगळा मामला आहे. एकाच घरातले ४ जण वेगवेगळ्या रुग्णालयात आणि उरलेले १-२ लोक घरात... अशी परिस्थिती अनेक ठिकाणी उद्भवलेली आहे. 

त्यामुळे आतातरी आपल्या हौशीमौजीला जरा मुरड घालू या, अत्यावश्यक तेवढ्याच गोष्टी करू या... बाहेर जबाबदारीने वागू या... मास्क व सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करू या. 

कोरोनाचं संकट कधीतरी  संपेलच... पण कोरोनानंतरचं जग सहकुटुंब बघायची इच्छा असेल तर सध्या थोडे परिपक्वतेने वागूया.

कोणता मास्क वापरावा याबद्दल पुन्हा कधीतरी !


डॉ. रणजीत निंबाळकर,   ०८०८७८७३११५


डॉ निंबाळकर पुणेस्थित एक प्रथितयश आयुर्वेद चिकित्सक आहेत.

चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...